कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे काम वर्षभरात पूर्ण करावे

0

मुंबई: कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाच्या काठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. कोल्हापूर या ऐतिहासीक शहराच्या वैभवात भर घालणारे हे सेंटर वर्षभरात तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते.

राजाराम तलावाच्या जवळ तयार होणाऱ्या या कन्व्हेंशन सेंटरमध्ये २००० क्षमतेच ऑडीटेरीअम, बहुउद्देशीय हॉल, कॉन्फरन्स हॉल, आर्ट गॅलरी, ॲम्फीथिएटर आदी सुविधा असणार आहेत. राजाराम तलावामध्ये संगीत कारंजे, लाईट ॲण्ड साऊंड शो ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

स्थानिक आणि परिसरातील कलावंतासाठी आर्ट गॅलरी, ॲम्फीथिएटरच्या रुपाने हक्काचे व्यासपीठ तयार होणार असून याठिकाणी शहर आणि परिसरातील छोटे व्यावसायिक, उद्योजक यांना विविध विषयांवर प्रदर्शनासाठी केंद्र उपलब्ध होणार आहे. सेंटर निर्माण करतानाच त्याठिकाणी वृक्षारोपण करून त्याचे सुशोभीकरण करावे. त्याचबरोबर याभागात येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता पंचतारांकित हॉटेलसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

या सेंटरसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे बांधकाम एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारे सेंटर निर्माण करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथे भारत राखीव बटालियन क्र.३ ला जागा मंजूर करण्याबाबत बैठक घेण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी करावी आणि लोकांचे हित तसेच भारत राखीव बटालियनसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांबाबत चर्चा करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech