मुंबई : ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची मुलाखत.माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मतदार व्हा,देशाच्या विकासासाठी योगदान द्या’ या विषयावर मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शनिवार दि. २३ आणि सोमवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
२५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ही मुलाखत घेण्यात आली आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यभर राबविण्यात येणारे उपक्रम, मतदार यादीमध्ये नावे नोंदविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात येणारी जनजागृती, मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय, मतदार दिनाचे घोषवाक्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा मतदार जागृतीसाठी वापर आदी विषयांची माहिती श्री. बलदेव सिंह यांनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.